निफाड | प्रतिनिधी | Niphad
निफाड तालुक्यात (Niphad Taluka) गुरुवार (दि.५) रोजी झालेल्या पहाटेच्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा पीके, कांदा रोपे त्याचबरोबर द्राक्षपंढरी असलेल्या द्राक्षांसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कुठलाही अंदाज म्हणा की ध्यानीमनी नसतांना तालुक्यातील शेतकरी (Farmer) साखर झोपेत असतांनाच पहाटे आलेल्या या जोरदार पावसाने बळीराजाचे प्रचंड प्रमाणावर काढुन ठेवलेला लाल कांदा व नुकताच लावलेला उन्हाळ कांदा व अन्य पिकांच्या उत्पादनावर या पावसाचा मोठा परिणाम होणार आहे. तालुक्यातील द्राक्षपट्टा असलेल्या सावरगाव, सारोळे खुर्द, खडकमाळेगाव, उगाव, शिवडी, निफाड, कसबे सुकेणे, ओझर, पिंपळगाव बसवंत, पालखेड मि., रानवड आदी द्राक्ष पट्टयात द्राक्ष उत्पादकांचे या जोरदार झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. याआधी खरीप पीक पंचनामा होऊनही काही शेतकऱ्यांना नुकसान (Damage) भरपाई मिळालेली नाही.
रब्बीच्या (उन्हाळ कांदा) लागवडीसाठी कांदा (Onion) रोपे जमिनीतच सडून जात आहे. काढायला आलेल्या लाल व रांगड्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन कृषि अधिकारी, कृषि सेवक, ग्रामसेवक, तलाठी यांना पंचनामे करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी द्याव्यात आणि नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत काही ठिकाणी तलाठी, कृषीसेवक, ग्रामसेवक उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी आहे. तर ई-पीक पाहणीबाबत तालुक्यातील शेतकरी वर्ग अजूनही उदासीन असल्याने याबाबत प्रशासकीय स्तरावर प्रशासनाच्या वतीने जनजागृती होणे गरजेचे आहे.
द्राक्ष उत्पादकांना संपूर्ण कर्जमाफीशिवाय गत्यंतर नाही. द्राक्ष उत्पादकांचे मरण जर टाळायचे असेल तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफीचे धोरण नवनियुक्त महायुतीच्या शासनाने हा निर्णय त्वरीत घ्यावा. कारण २०१४ पासून द्राक्ष उत्पादकांचे शुक्लकाष्ट अस्मानी, सुलतानी संकटाने संपता संपेना. निसर्गाशी लढता लढता द्राक्ष उत्पादक हतबल झाला आहे.
छोटुकाका पानगव्हाणे, द्राक्ष उत्पादक, उगाव