करंजी खुर्द | प्रतिनिधी | Kranji khurd
काल (शनिवारी) निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) पुर्व भागातील खेडलेझुंगे, कोळगाव, सारोळे थडी, ब्राह्मणवाडे, करंजी खुर्द, तामसवाडीसह आदी गावांमध्ये रात्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात मका, सोयाबीन, कांदा आणि उन्हाळा कांदा रोप यासह द्राक्ष बागांचा समावेश आहे.
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली होती. त्यापूर्वी सलग झालेल्या पावसामुळे परिसरात पिकांचे सरासरी ६० ते ७० टक्के नुकसान झाले होते. आता उरलेल्या ३० ते ४० टक्के पिके हीच शेतकऱ्यांच्या हंगामाचा आधार होता. मात्र, या पावसाने तोही हिरावून नेला. शेतकऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम करून तयार केलेल्या शेतमालाची कापणी सुरू असताना पावसामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
दरम्यान, कापणी केलेला मका, सोयाबीन शेतातच ओले झाल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी कांद्याची कोवळी रोपे चिखलात बुडाली आहेत. याशिवाय चाळीत खराब होत असलेला कांदा (Onion) वाळवण्यासाठी बाहेर उन्हात पसरविला होता, तोही पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. तसेच जनावरांचा चारा देखील पावसाने भिजवून खराब झाल्याने वर्षेभर जनावरांना चारा कुठून आणायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




