नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Nashik MC Election) १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर शेवटच्या दिवशी १,३३१ उमेदवारांनी अर्ज भरले. यानंतर आज (बुधवारी) निवडणूक अधिकाऱ्यांकडून वैध अर्जांची छाननी केली जात आहे. या निवडणुकीत भाजपने ११८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपने उमेदवारच दिलेला नाही.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : महापालिकेच्या १२२ जागांसाठी तब्बल २,३५७ उमेदवारी अर्ज दाखल; आज छाननी
याशिवाय शिवसेना (शिंदे गट) ८०, राष्ट्रवादी (अजित पवार) ४१, शिवसेना (ठाकरे गट) ८२,राष्ट्रवादी (शरद पवार गट) ३१, मनसे ३४, काँग्रेस २२, आपने ३५ आणि माकपने ०९ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
मात्र, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत अर्ज बाद करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

सदर पत्रात, उपरोक्त विषयान्वये नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या उमेदवारी अर्जास जोडपत्र- २ (बी-फॉर्म) जोडणे बंधनकारक आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या उमेदवारी अर्जास जोडण्यात आलेल्या जोडपत्र २ वर डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) करण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी; भाजपने ‘या’ माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट
निवडणूक नियमावलीनुसार जोडपत्र २ वर अधिकृत व मूळ (Original) स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेले जोडपत्र वैध धरता येत नाही. तरी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने, सदर गटाच्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावेत, ही नम्र विनंती. आपण याबाबत योग्य ती तातडीची कारवाई करावी, ही विनंती, असे केदार यांनी पत्रात म्हटले आहे.




