नाशिक | Nashik
महानगरपालिका निवडणुकींचे बिगुल वाजताच राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. आज ३० डिसेंबर रोजी निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यावेळी, प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक कार्यकर्त्यांला एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा होती, मात्र तसे घडले नसल्यामुळे उमेदवरांमध्ये रोष पहायला मिळाला. नाशिकमध्ये दुपारी मोठा राडा पहायला मिळाला. काही इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचाच पाठलाग केला. तर, काही इच्छुक उमेदवारांनी एका फार्महाऊसची तोडफोड केल्याचेही समोर आले.
नाशिक शहरात मंगळवारी दुपारी मोठा राजकिय ड्रामा बघायला मिळाला. उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघा एक तास शिल्लक असतानाच एबी फॉर्मची पळवापळवी बघायला मिळाली. अनेक इच्छुक उमेदवार एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज झाले. नाशिकच्या विल्होळी येथे दुपारी एका फार्म हाऊसवर एबी फॉर्म वाटपाच्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन पोहोचले. त्यांनी आधी परिस्थितीचा आढावा घेतला आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला. “नाशिक महापालिकेत जागा 122 आहेत, आणि मागणाऱ्यांची संख्या ही हजारोंवर आहे. ज्या घटना घडल्या त्या चुकीच्या घडल्या आहेत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू.” असे ते म्हणाले.

काय म्हणाले गिरीश महाजन
“जे झाले ते अतिशय चुकीचे आहे. कारण या ठिकाणी जागा फक्त १२२ आहेत आणि आमच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या एक हजारांच्या आसपास होती. त्यातच आज एबी फॉर्म देण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं काम सुरू होते. मात्र, अनेकांना वाटले की आपल्यालाच तिकीट मिळाले पाहिजे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. आता सर्वांनाच वाटते की आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. पण जागा कमी आहेत आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने असा गोंधळ झाला”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
तर अनेकांना एबी फॉर्म देताच आले नसते
“आता जर आमच्या पक्षाचे पदाधिकारी हे एबी फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेकांना ते एबी फॉर्म देताच आले नसते आणि एबी फॉर्म देण्याचे राहून गेले असते. त्यामुळे त्यांनी ते एबी फॉर्म गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे गेले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला”, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
हातघाईवर येणे हा प्रकार दुर्दैवी
“एबी फॉर्म देताना हे घडणे चुकीचे होते. कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला तो अयोग्य होता. या कार्यकर्त्यांना कोणी खतपणी घातले याची चौकशी करून कारवाई करू. सगळ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही. त्यात काही नवीन आलेले लोक आहेत त्यांनाही डावलता येत नाही. ते अपेक्षेने पक्षात आले होते. त्यामुळे हातघाईवर येणे हा प्रकार दुर्दैवी आहे. मी 8 दिवसांपासून नाशिकमध्ये असून सगळ्यांशी बोलणे झाले, चर्चा करून निर्णय घेतले आहेत. काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात पण मनासारखे झाले नाही. म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन,” असे त्यांनी यावेळी सांगितले.




