नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmer) दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने (Central Government) किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत महाराष्ट्रातील कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल १,८७५ रुपयांवरून २,१२५ इतका वाढविला आहे. सुधारित दर शनिवार (दि. ४) पासून लागू करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये अधिक मिळणार आहेत.
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संचालक शिवानी गोयल (Shivani Goyal) यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय कांदा बफर स्टॉक उभारण्यासाठी नाफेड व एनसीसीएफमार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीसाठी हा सुधारित दर लागू करण्यात आला आहे.
नव्या दरामुळे शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच बाजारातील कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यासही मदत होणार आहे. सध्या खुल्या बाजारात कांद्याचे दर दबावाखाली असल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दरवाढीमुळे नाफेड व एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी दरवाढ होऊनही नाफेड व एनसीसीएफच्या (NAFED and NCCF) खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सरकारने ३० जूनपर्यंत खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले असतानाही उद्दिष्टाच्या ४० टक्के खरेदीदेखील पूर्ण झालेली नव्हती. मात्र, नव्या दरवाढीनंतर खरेदीला वेग येईल आणि अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
असे वाढविले दर
यापूर्वी नाफेड व एनसीसीएफने टप्प्याटप्प्याने कांदा खरेदीचे दर वाढविले होते. सुरुवातीला प्रतिक्विंटल १,२३५ रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २६ मे रोजी दर १,५८०, १२ जूनला १,६५०, १९ जूनला १,७३० आणि ४ जुलैपूर्वी १,८७५ रुपये इतका करण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार खरेदी दर थेट २,१२५ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.




