Sunday, April 26, 2026
HomeनाशिकNashik Rain News : दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात गारांसह पाऊस; निफाड, सिन्नर, बागलाणला...

Nashik Rain News : दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात गारांसह पाऊस; निफाड, सिन्नर, बागलाणला अवकाळीचा फटका

गारपीटीमुळे कांदा, भाजीपाला सडण्याची भीती, शेतकरी चिंताग्रस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, बागलाण तालुक्यात रविवारनंतर सोमवारीही पावसाने (Rain) हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्याला (District) मंगळवारी (दि.३१) ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला असून जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, टरबूज यांसारख्या पिकांवर (Crops) मोठा परिणाम झाला आहे. आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. काही ठिकाणी उभे पीक आडवे झाले. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कांदा व भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचल्याने कुजण्याचा धोका वाढला आहे.

जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून, मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागात ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. गारपिटीनंतरही हवामानातील हा बदल कायम राहणार आहे. १ आणि २ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, याकाळात ४०-५० कि.मी. वेगाने वारे वाहून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट प्रक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

विंचुर दळवीत मोठे नुकसान

रविवारी (दि. २९) वडगाव पिंगळा परिसरात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. चिंचोली आणि विंचूर दळवी भागात तुलनेने कमी पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेडनेटचे मोठे नुकसान झाले. काही भागात झाडे उन्मळून पडली. हवेमुळे विजेच्या ताराही तुटल्याही गावात रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. शेडनेट उडून गेल्याने पावसाचे पाणी शेतात साचल्याने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानाचे अचूक मूल्यांकन करावे, नुकसानभरपाई त्वरित जाहीर करावी, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन कचरु गंधास यांनी केली आहे.

जिल्ह्यात पाचशे हेक्टर पिकांना फटका

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्राथमिक अहवालानुसार एकूण ४८२.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील सात गावांमधील १,१५२ शेतकरी या आपत्तीमुळे प्रभावित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अहवालानुसार सर्वाधिक फटका निफाड आणि सिन्नर तालुक्यांना बसला आहे. निफाडमधील तीन गावातील ७६३ शेतकरी प्रभावित झाले असून सुमारे २६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्यातील तीन गावातील ३७९ शेतकरी प्रभावित असून सुमारे २०९.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याशिवाय नाशिक तालुक्यात एका गावातील १० शेतकऱ्यांचे सुमारे पाच हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. इतर तालुक्यांमध्ये सध्या नुकसानाची नोंद नाही. रविवारी झालेल्या पावसामुळे कांदा १९५ हेक्टर, मका ५२ हेक्टर, गहू १२२.७० हेक्टर, इतर पिके ८० हेक्टर असे नुकसान नोंदवण्यात आले आहे. फळपिकांमध्येही मर्यादित नुकसान झाले असून सुमारे पाच हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची नोंद आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची...