नाशिक | Nashik
मान्सूनचे (Monsoon) राज्यात आगमन होऊनही काही शहरांत अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाच दिवसांपूर्वी शहरातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले.
यानंतर (रविवारी) चार वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील विविध भागांत हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे नाशिककरांची (Nashik) चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याने बळीराजा प्रचंड सुखावला आहे. दुपारी अचानक आभाळ भरून आल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
त्यानंतर सीबीएस, मेहेर चौक, सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागांत पाणी (Water) साचल्याने वाहनधारकांना संथ गतीने प्रवास करावा लागला.तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी लपण्यासाठी पानटपऱ्यांचा आश्रय घेतला होता.
ग्रामीण भागात शेती कामांना वेग
नाशिक शहरात आठवडाभर जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी ग्रामीण भागात मात्र पावसाने हजेरी कायम ठेवली होती. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांत चांगलाच पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.




