नाशिक | Nashik
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, शनिवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्याला उष्णतेच्या (Nashik Temperature News) लाटेने चांगलेच कचाट्यात पकडले आहे. नाशिक शहरात काल (शनिवारी) कमाल तापमान ४१.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर मालेगावमध्ये (Malegaon) पारा ४३.४ अंशांपर्यंत पोहोचल्याने उत्तर महाराष्ट्र अक्षरशः होरपळून निघाला आहे.
नाशिक शहरासाठी (Nashik City) प्रशासनाने ३९.५ अंशांची धोक्याची पातळी निश्चित केली असताना, प्रत्यक्षात पारा दोन अंशांनी पुढे गेल्याने उष्मालाटेचे संकट अधिक गडद झाले आहे. नाशिक शहरात गेल्या २४ तासांत तापमानात अचानक वाढ झाली असून रस्ते दुपारपासूनच निर्मनुष्य झाले होते. जिल्ह्यातील सुरगाणा येथे ४२ अंश, तर मालेगावमध्ये ४३.४ अंशांची उच्चांकी नोंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. केवळ दिवसच नव्हे, तर किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही नाशिककर प्रचंड उकाड्याने घामाघूम होत असून नागरिकांची झोप उडाली आहे.
विदर्भात ४५ अंशांचा आगडोंब
विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर असून अकोला आणि अमरावतीमध्ये यंदाच्या हंगामातील विक्रमी ४५.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात तब्बल ६८ वर्षानंतर ४२.२ अंश तापमानाची नोंद झाल्याने हवामान बदलाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
तापमानातील या अचानक वाढीमुळे नवजात बालके, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उष्माघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विनाकारण उन्हात बाहेर न पडण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.





