नाशिक | प्रतिनिधी | Nashik
“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… निवृत्तीनाथ महाराज की जय” अशा जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या जयघोषाने सोमवारी (दि.२९) त्र्यंबकेश्वरहून आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या (Sant Nivruttinath Maharaj) पालखीचे पंढरपूरकडे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी त्र्यंबकनगरीत (Trimbakeshwar) राज्यभरातून हजारो वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्ती सागरात न्हाऊन निघाला होता.
यंदा पालखीची मुख्य पूजा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते झाली. कुंभमेळ्याच्या कामांमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील पालखीचा पारंपारिक मार्ग बदलण्यात आला होता. त्यामुळे पालखी निवृत्तीनाथ महाराज मंदिराकडून हनुमान मंदिर, चौकी माथा, सुंदराबाई मठ या मार्गाने सरळ खाली कदम मार्गाकडे आणण्यात आली.
दरम्यान, यानंतर पुढे भगवती चौकात रथ थांबवून पालखी पायी तीर्थराज कुशावर्त येथे नेण्यात आली. याठिकाणी परंपरेनुसार नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि नगरसेवकांकडून (Corporators) पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच देवाच्या पादुकांना आणि मूर्तीला पवित्र स्नान व अभिषेक घालण्यात आला.




