नाशिक । प्रतिनिधी
पंतप्रधानांनी देशात १४ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी घातल्यानंतर आता अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय सेवकांनाही घरीच बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागाचे सेवक वगळता उर्वरीत सर्वांना सुटी देण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडण्यास बंदी करण्यात आली आहे.आवश्यकता असल्यास तत्काळ बोलवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.
राज्यातील सेवकांची संख्या टप्प्याटप्प्याने घटवत 5 टक्के करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक सेवा सोडून सर्वच सेवकांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
संपर्क क्रमांक मुख्यालयात
जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांना सुटी देण्यात आलेली असली तरी त्यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल आयडी आदी माहिती कार्यालयात ठेवण्याचे आदेश सीईओ बनसोड यांनी दिले आहेत. कोणत्याही क्षणी बोलवल्यास त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही त्यांनी दिले.




