नवी दिल्ली | New Delhi
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहे. यंदा लग्नसराईत याची झळ चांगलीच बसल्याचे पाहायला मिळाले.अशातच काल (रविवारी) एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना सोने खरेदी न करणे, परदेश दौरे कमी करणे आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. यासोबतच कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ वाढवण्यासही सांगितले. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक्सवर पोस्ट करत (ट्विट) पंतप्रधान मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “मोदीजींनी काल जनतेकडे त्यागाची मागणी केली. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम (Work from home) करा. हे उपदेश नाहीत – हे अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, जनतेला सांगावे लागत आहे – काय खरेदी करावे आणि काय करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी दरवेळी ते दोष जनतेवर ढकलून देतात. देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड’ (तडजोड केलेल्या) पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही.” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील जनसभेला संबोधित करताना म्हटले होते की, “एक वर्षापर्यंत सोने खरेदी करू नये. करोनाच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्स सारख्या व्यवस्थांचा स्वीकार केला होता. आपल्याला त्याची सवय झाली होती. आजही वेळेची हीच मागणी आहे की, आपण त्या व्यवस्थांना पुन्हा एकदा प्राधान्य दिले पाहिजे. इराण युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे, त्यामुळे इंधन बचत करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर खताची (फर्टिलायझर) गोणी ३,००० रुपयांना मिळत असताना, भारत सरकार तीच गोणी भारतीय शेतकर्यांना केवळ ३०० रुपयांत उपलब्ध करून देत आहे”, असेही त्यांनी सांगितले होते.





