नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आयआयटी दिल्लीच्या (IIT Delhi) ५७ व्या दीक्षांत समारंभाला (Convocation Ceremony) उपस्थित राहून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी “आज सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभाला उपस्थित आहेत, पण प्रत्येकाच्या मनात भविष्याबाबत नक्कीच काही ना काही सुरू असेल,” असे म्हणत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना (Student) मेडल प्रदान करताना पंतप्रधान म्हणाले की, “जसा तुमच्या कुटुंबाला (Family) तुमचा अभिमान वाटतो, तसाच मलाही तुमचा अभिमान आहे. पण मेडल विजेत्यांमध्ये आणखी मुली असत्या तर मला अधिक आनंद झाला असता. फक्त एक-दोन का? मुलींची संख्या आणखी असायला हवी होती.जगभरात तंत्रज्ञानाच्या गतीमुळे ग्लोबल पॉवर बॅलन्स वेगाने बदलत आहे. अशा काळात जो सतत नवीन गोष्टी शिकत राहील आणि आव्हानांचे संधीत रूपांतर करेल, तोच जिंकेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
मी काही बाबा बागेश्वर नाही
भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक मजेशीर किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले, “मी काही बाबा बागेश्वर नाही, पण तुमच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज मला नक्कीच येत आहे.तुमच्यापैकी काही जण पहिल्या नोकरीची आणि पगाराची वाट पाहत असतील, तर काही जण स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत असतील. काही विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असतील. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असले, तरी आज सर्वांच्या मनात एकच उत्साह आहे” असे मोदींनी म्हटले.
नाते आणि कृतज्ञता जपा
पंतप्रधान पुढे म्हणाले की,”कॅम्पस लाईफ, मित्र, प्रोफेसर आणि स्टाफ हे तुमचे कुटुंब बनले आहेत. तुमच्या यशात या सर्वांचा वाटा आहे. हे नाते कायम ठेवा आणि जाता जाता एकमेकांना नक्की भेटून जा,” असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.तसेच आयआयटी दिल्लीतील पहिल्या दिवसाच्या ओरिएंटेशनपासून ते आजच्या दीक्षांत समारंभापर्यंतचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात करत असून, त्यांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही मोदींनी केले.




