नवी दिल्ली | New Delhi
राजधानी दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतर परिसरात सोमवारी (दि.२१ जुलै) रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या संसद मार्चदरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता परिस्थिती चिघळली. या दरम्यान पोलिसांनी (Police) केलेल्या अमानुष लाठीचार्जात १५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून, अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी आज (मंगळवारी) दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पोलीस आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
अभिजीत दीपके यांचे पोलीस व सरकारवर गंभीर आरोप
यावेळी ते म्हणाले की, “पोलिसांच्या लाठीचार्जात १२ वर्षांच्या मुलीचे डोकं फुटले असून १५-१६ वर्षांच्या मुलींचे गळे दाबण्यात आले. एका विद्यार्थिनीचे (Student) कपडे फाडून तिला छातीवर पाय देऊन मारहाण करण्यात आली, असा अस्वस्थ करणारा दावा दीपके यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होऊ नये आणि पोलिसांच्या हिंसाचारापासून तरुणांचा बचाव व्हावा, यासाठी कालचा ‘संसद मार्च’ मागे घ्यावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आणखी मुलांचे बळी घ्यायचे आहेत का? पोलिसांना आंदोलकांचे खून करण्याचे आदेश दिले होते का?” असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्यावरही पोलिसांनी हल्ला केला असून संदीप लांबा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे केस खेचल्याचा आरोपही दीपके यांनी केला.
आंदोलकांवरील हल्ला पूर्व नियोजित कट असल्याचा केला आरोप
अभिजीत दीपके पुढे म्हणाले की, जंतर-मंतरवर कडक सुरक्षा आणि बॅरिगेटिंग असताना दगडांनी भरलेले ट्रक आत कसे आले? असा प्रश्न विचारत, पोलिसांनी नावाची पाटी (नेम प्लेट) काढून आणि सिव्हिल ड्रेसमधील गुंडांना काठ्या देऊन आंदोलकांवर हल्ला घडवून आणला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलीस ज्या क्रूरतेने काठ्या चालवत होते, त्यावरून त्यांना कोणाचा जीव गेला तरी चालेल पण प्रश्न विचारणारे उरणार नाहीत, असाच आदेश असावा. या सरकारला मुलांच्या जिवाची कोणतीही पर्वा नाही”, असेही त्यांनी म्हटले.
सध्याची परिस्थिती
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, गळ्यावर गंभीर दुखापत झालेल्या एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. जर या विद्यार्थिनीला काही बरे-वाईट झाले, तर त्याला थेट पंतप्रधान जबाबदार असतील, असा इशारा दीपके यांनी दिला आहे. दरम्यान, या हिंसाचारानंतर आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे उपोषण सोडण्याच्या तयारीत असलेले सोनम वांगचुक यांनी पुन्हा आपले उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




