
धाराशिव । Dharashiv
कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून देशासाठी सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या एका गुणवंत महिला खेळाडूने संसाराच्या आखाड्यात मात्र अखेर हार मानली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याची अतिशय दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने केवळ धाराशिव जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र सुन्न झाले आहे.
या घटनेत आई अश्विनी मनोहर पौळ (वय ३०, मूळ रा. व्हंताळ, ता. उमरगा; सध्या रा. आंबुलगा, निलंगा) आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी चिमुकली वीरा हिच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेच्या दिवशी अश्विनी या आपल्या तीन लहान मुलांसह हातात केक घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्ल्याच्या आवारात वाढदिवस साजरा करण्यास सुरक्षारक्षकांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच केक कापला. मात्र, तो वाढदिवस नेमका कोणाचा होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. केक कापल्यानंतर काही वेळातच ही भीषण दुर्घटना घडली.
अश्विनी पौळ (माहेरच्या मोहिते) या राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या अव्वल कुस्तीपटू होत्या. त्यांनी २००७ मध्ये केरळ (तिरुवनंतपुरम), २००८ मध्ये पंजाब (गुरुदासपूर) आणि २००९ मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली होती. त्यांचे वडील तानाजी मोहिते, पती मनोहर पौळ आणि भाऊ-बहीण असे संपूर्ण कुटुंबच कुस्ती क्षेत्राशी जोडलेले आहे. त्या महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) कार्यरत होत्या; मात्र काही महिन्यांपूर्वी पतीच्या सांगण्यावरून त्यांनी नोकरी सोडली होती आणि त्या माहेरी राहत होत्या.
याप्रकरणी मृत अश्विनी यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर आणि पतीवर सतत मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळूनच लेकीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गंभीर आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी आणि घटनेमागील मुख्य कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. एका गुणवंत राष्ट्रीय खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक मानसिक ताणतणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




