मुंबई | Mumbai
दिवंगत नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत अनेक राजकीय घडामोडी घडल्याच्या पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील निवड करण्यात आली. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा पदांशिवाय उल्लेख केल्याने त्यांना पदावरून काढून टाकल्याच्या चर्चांनी पक्षात मोठे वादळ उठले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे पुत्र, राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांनी पक्षात घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.
पार्थ पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित कथा म्हणजे निव्वळ कल्पित कथाच आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा, असे म्हणत पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवारांनी काय दावा केला?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांना देण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला १६ फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. तर २८ जानेवारीला अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधीदरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला , तो ग्राह्य धरू नये असे सुनेत्रा पवारांनी १० मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवारांनी केला. या पत्रांवरून राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले.





