मुंबई । प्रतिनिधी Mumbai
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाविरोधातील मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे.राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार. महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे, असे जयंत पाटील यांनी एक्स या समाज माध्यमातील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.




