Friday, February 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP News: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व…; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा मोठा दावा

NCP News: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व…; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा मोठा दावा

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु, आज जर अजितदादा असते तर नक्कीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते, अशी चर्चा रंगली आहे. फेब्रुवारीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरु होती. परंतू अजित पवारांच्या अकाली निधनामुळे या चर्चा थांबल्या. आता मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

विलिनीकरणानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवण्याचा निर्णय होता
शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, “विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

- Advertisement -

साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे की, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलीनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.

Narhari Zirwal: “चुकीला माफी नाही”; एसीबीच्या जाळ्यात विभागातील अधिकारी अटकताच मंत्री झिरवाळ म्हणाले, तर त्याची शिक्षा…

महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवारांच्या निधनानंतर स्वतः शरद पवार यांनीच १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय होणार होता, असे सांगितले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर खरेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या का? याबाबतची जोरदार चर्चा रंगली. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीन रोहित पवारांना खुले आव्हान दिले. त्यावर रोहित पवारांनी, “दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगतो आहोत,” असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता शशिकांत शिंदेंनी केलेल्या दाव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख नेते काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्या

झिम्बाब्वेने

AusVsZim ICC T-20: टी-२० विश्वषचकातील सर्वात मोठ्या ‘अपसेटची’ नोंद; झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर...

0
मुंबई | Mumbaiटी-20 विश्वचषक 2026 मध्ये शुक्रवारी एक असा चमत्कार घडला, ज्याची कल्पना कदाचित कोणत्याच क्रिकेट चाहत्यांनीही केली नसेल. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या...