मुंबई | Mumbai
माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात भरून काढली आहे. कृषिमंत्रिपदाचा कारभार हातात घेताच २४ तासांच्या आत भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषी खात्याला नवीन चेहरा मिळाला. आता खात्यात लवकरच काही मोठे बदल होतील अशी अपेक्षी होती. पण नवीन कृषीमंत्र्यांनी सुद्धा नमनालाच घडाभर तेल ओतले. त्यांनीही या खात्याच्या कारकिर्दीची सुरुवात वादाचा नारळ फोडूनच केली. त्यांच्या वादग्रस्त विधानाने आता हे खाते पुन्हा वादाच्याच वलयात हरवणार का? असा सवाल करण्यात येत आहे.
नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केले. त्यावरून वाद उफाळला आहे. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात. पण वाकडे काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसे, लोक नोंद ठेवतात, असे वक्तव्य भरणे मामांनी केले आहे. महसूल संदर्भातील एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. भरणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादाची चिन्हे आहेत. वाकडे काम केल्यावर ते नियमात कसे बसवता येते? असा खोचक सवाल विरोधक त्यांना विचारत आहेत. तर आता कृषी खात्यात वाकडे काम होणार आहे की काय? असा चिमटा ही काहींनी त्यांना काढला आहे.
महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषिमंत्र्यांकडून अशी मांडणी होणे, हे अनेकांना पचनी पडले नसावे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडे करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही सांगितले. मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगणार असून , कृषिमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





