अहिल्यानगर (प्रतिनिधी)
वर्षानुवर्षे स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) ठाण मांडून बसलेल्या काही मोजक्या अंमलदारांच्या ‘मक्तेदारी’ला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘हुजरेगिरी’ आणि ‘राजकीय आश्रय’वर आधारित ही यंत्रणा उध्वस्त करत बुधवारी तब्बल 39 नव्या अंमलदारांची नियुक्ती केली. गेल्या चार-पाच वर्षांत एलसीबीसाठी नवीन अंमलदारांची नियुक्ती झाली नव्हती.
यापूर्वी एलसीबीचा कारभार प्रामुख्याने संलग्न अंमलदारांच्या आधारेच सुरू होता. मात्र, ही यंत्रणा अनेकदा वादग्रस्त ठरली. बदली होऊनही काही अंमलदार वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी कार्यरत होते, तर काहींनी वरिष्ठांची ‘खुशामत’ करून आपली जागा पक्की केली होती. परिणामी, एलसीबी ठराविक गटाचे ‘अड्डे’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले होते. पूर्वी वाढता राजकीय हस्तक्षेप आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहता तात्कालीन पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये कोणतीही थेट नियुक्ती केली नव्हती. त्याऐवजी, सायबर पोलीस ठाण्यातील 18 ते 20 अंमलदारांना एलसीबीसाठी संलग्न काम करण्याचे आदेश दिले होते. काही पोलीस ठाणे/शाखेत नियुक्तीला असलेल्या अंमलदारांना संलग्न करण्यात आले होते. हे अंमलदार गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून एलसीबीचे काम बजावत होते. त्यांची तपास कौशल्ये आणि कामगिरी लक्षात घेऊनच यावेळी त्यांना थेट एलसीबीमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
एलसीबीमध्ये नियुक्त झालेल्या 39 अंमलदारांमध्ये – बिरप्पा करमल, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, गणेश धोत्रे, शाहीद शेख, अमृत आढाव, सुनील मालणकर, रमिझराजा आतार, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, गणेश लोंढे, विष्णु भागवत, भिमराज खर्से, राहुल व्दारके, गणेश लबडे, हृदय घोडके, रमेश गांगर्डे, सुवर्णा गोडसे, सुयोग सुपेकर, रिचर्ड गायकवाड, अमोल आजबे, सुनील पवार, विजय पवार, शामसुंदर जाधव, सतिष भवर, सोनल भागवत, राहुल डोके, वंदना मोढवे, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, योगेश कर्डिले, शामसुंदर गुजर, चिमा काळे व सोमनाथ झांबरे यांचा समावेश आहे.
‘हुजरेगिरी’वर पूर्णविराम
एलसीबीमध्ये काही अंमलदारांची वर्चस्वशाही इतकी पक्की झाली होती की, बदलीचे आदेश असूनही ते जागेवरच टिकून राहिले. वरिष्ठांची सतत ‘खुशामत’ आणि ‘हुजरेगिरी’ करून त्यांनी स्वतःसाठी सुरक्षित वातावरण तयार केले होते. यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली होती. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पदभार घेताच या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी नवा पायंडा पाडत, केवळ तपासाचा अनुभव, निष्कलंक सेवाभूमी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणार्या अंमलदारांनाच नियुक्ती दिली.
बदलाचा नवा अध्याय
एलसीबीचा भूतकाळ राजकीय हस्तक्षेप, निवडक अंमलदारांची मक्तेदारी आणि कार्यपध्दतीवरील संशयांनी व्यापलेला होता. अशा पार्श्वभूमीवर घार्गे यांनी केलेली मोठ्या प्रमाणावर नियुक्ती ही केवळ ‘मानवबळ’ वाढवण्याची पाऊल नाही, तर जुनी ‘हुजरेगिरी संस्कृती’ मोडून टाकणारा ठोस निर्णय आहे. या बदलामुळे एलसीबीची प्रतिमा सुधारण्याची शक्यता आहे, तसेच गुन्हे तपासात नवी उर्जा आणि काटेकोरपणा येईल, असा विश्वास पोलीस दलात व्यक्त केला जात आहे.




