मुंबई । प्रतिनिधी
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार आज, रविवारपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे.
याशिवाय उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्स, सर्व सिनेमागृहे, रेस्टॉरंट या कालावधीत वेळेत बंद राहणार आहेत. फक्त रेस्टॉरंटमधे या कालावधीत पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. या नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजारांचा दंड तसेच मास्कशिवाय आढळल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपयांचा दंड आकारला काही. जमावबंदीचा आदेश १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज नवीन नियमावली जारी केली. सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्नसमारंभांसाठी ५० व्यक्ती संख्येची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी २० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.
आरोग्य आणि अतयावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे बंधन असणार आहे.सरकारी कार्यालयांमध्येही फक्त लोकप्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. इतर अभ्यागतांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवेश देण्यात येईल.इतर अभ्यागत ज्यांना बैठकांसाठी बोलावण्यात आले असेल त्यांना विशेष पासेस देण्यात येतील.
धार्मिक स्थ्ळांमध्येही प्रवेश मर्यादित स्वरूपातच देण्यात येणार आहे. जागेची उपलब्धता आणि अंतर नियम लक्षात घेऊन प्रत्येक तासाचे प्रवेश संबंधित व्यवस्थापनास निश्चित करावे लागणार आहेत.