Thursday, May 2, 2024
Homeनगरमाऊलींच्या नेवाशात मागितले जातेय करोना पसायदान

माऊलींच्या नेवाशात मागितले जातेय करोना पसायदान

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

जगाच्या कल्याणाचे पसायदान मागणार्‍या श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये करोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.

- Advertisement -

श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला असा हा नेवासा. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच विश्वात्मक देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान मागितलेले आहे.

त्याच नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित करोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे. सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील मंदिरांबाहेर भिंतीवर सर्वत्र चिकटविलेले दिसून येत आहे. हे पसायदान लिहिण्यामागे लोकांना शहाणे करण्याचा हेतू मात्र माऊली प्रमाणेच उदात्त आहे.

या करोना पसायदानातून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, घरातच निवांत बसून रहावे. एकमेकांशी हात न मिळवता दुरूनच नमस्कार करावा. सुरक्षित अंतर ठेवावे.थंड ऐवजी कोमट पाणी प्यावे.घरात बसून कंटाळा आला तर गृहिणीला मदत करावी, घराची, मनाची व तनाचीही साफसफाई करावी.

आजपर्यंत खूप धावाधाव केली. आता शरीराला थोडी विश्रांती दे. करोना विषाणूचे संकटात मनाला बळकट करा, स्वतःभोवती ध्यान-धारणा, योगाचा वज्रटत उभा करावा. वेळ मिळाला नाही म्हणून आज पर्यंत वाचला नसेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचवा.दिल्ली व राज्य शासन वारंवार अवाहन करत आहे,त्यांना सहकार्य करा.

बेफिकीर वागू नका नाही तर धोका वाढेल. शासन, पोलीस, डॉक्टर,स्वच्छतेचे शूरवीर अहोरात्र सेवा देत आहेत त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवावे. दुःखाचे दिवस जाऊन पुन्हा सुखाचे दिवस येतील तोवर संयम ठरवावा असे आवाहन या पसायदानातून करण्यात आले आहे.

* करोना पसायदान *

आता सर्वात्मके जीवे। विनाकारण न फिरावे॥

घरीच बैसूनी रहावे। निवांतपणे॥

एकमेका कर न मिळवावे। दुरुनीच नमस्कारावे॥

अंतर सुरक्षित राखावे। परस्परामाजी॥

सर्वसर्वदा हात धुवावे। रूमालविना न शिंकावे॥ कोमट जल प्राशावे। थंड वर्जावे सर्वथा ॥

घरी येता जरी कंटाळा। मदत करावी गृहिणीला॥

पुण्य लगे जीवाला। पतीव्रतेचे॥

करा स्वच्छता सदनाची। त्याच बरोबर तनाची॥

काढा जळमटे मानाची। शुचिर्भूत व्हावया॥

करा मनन आणि चिंतन। थोडा वेळ नामस्मरण॥

चुकविता येईल मरण। स्वतःसहित इतरांचे॥

आज पावे तो खूप पळाला। आता विश्रांती शरीराला॥

सादर व्हावे समयाला। संत वचन हे असे॥

आहे विषाणूचे संकट। करा मनाला बळकट॥

ध्यान योगाचा वज्रटत। उभारावा भोवताली॥

समय नव्हता म्हणो। केले नसेल वाचन॥

ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन। आता तरी वाचावा॥

आयुष्याला पुरेल। पुरोनिया उरेल॥

ग्रंथाची ऐसी रेलचेल। आहे संत कृपे॥

अवाहन करिती वारंवार। दिल्ली आणि मुंबईकर॥ धोका वाढेल फार । बेफिकीर रहाता॥

शासन, पोलीस, डॉक्टर। स्वच्छतेचे हे शुरवीर॥

सेवा देतो अहोरात्र। स्मरण त्याचे असावे॥

हे ही जातील दुःखदिन। येतील पुढे सुखाचे क्षण॥

तोवर संयमाचे पालन। मनापासोन करावे॥

येथे म्हने श्री निसर्ग रावो। कोरोना ना पसरावो॥

हाच हेतु मनी ध्यावो। जन कल्याण हेतुने॥

या विश्वातील संपूर्ण प्राणिमात्र व जीव सुखी राहावे यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाकरिता पसायदान मागितले. तसेच या कोरोना पसायदानाच्या माध्यमातून सुरक्षित कसे राहावे हा समाजाला संदेश दिला आहे. माऊलींनी ज्या ठिकाणाहून पसायदानाची निर्मिती केली त्याच भूमीतून कोरोना पसायदानाच्या निमित्ताने विश्वाला पुन्हा संदेश दिला आहे.

– शिवाजी महाराज देशमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, नेवासा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग,प्रशासन विविध उपाययोजना करत समाज्यात जनजागृती करत असताना आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाचा संदर्भ घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन या पसायदानातून करण्यात आले आहे.

– नारायण महाराज ससे लेखक, करोना पसायदान

- Advertisment -

ताज्या बातम्या