अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून आजपासून (बुधवार दि. 15) शिल्लक 200 दलघफू पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी लोकप्रतिनिधी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, प्रमुख नेते मंडळी व शेतकरी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी रात्री सुरू केलेले बेमुदत आंदोलन दुसर्या दिवशी मागे घेतले.
अकोले, धामणगाव रस्त्यावरील घोलप वस्तीनजीक असणार्या कालव्यामध्ये बसून शेतकर्यांनी रात्र जागून काढली. भजनाच्या साथीने आंदोलन शेतकर्यांनी सुरू करून सर्वांचे लक्ष वेधले होते. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या आंदोलनाची दखल घेत याप्रश्नी अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार जलसंपदा व कालवा विभागाचे अधिकारी तत्काळ अकोले येथे दाखल होऊन शेतकरी व आंदोलकांचे नेते यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मागण्या मान्य झाल्यामुळे हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले.
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हारदे, उपअभियंता यूवराज खडके, कवडे हे मंगळवारी अकोले येथे पोहोचले. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, माकपचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले, शिवसेनेचे बाळासाहेब भोर, अगस्ति कारखान्याचे संचालक पर्बत नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, अमृतसागर दूध संघाचे संचालक आप्पासाहेब आवारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माजी प्राचार्य शांताराम गजे, अगस्ति पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश पापळ, अण्णा शेटे, माजी उपसरपंच अशोक देशमुख, वाशेरेचे सरपंच किरण गजे यांच्यासह डाव्या व उजव्या उच्चस्तरीय कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावचे अनेक सरपंच, शेतकरी उपस्थित होते.




