अमरावती – ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ ही भावना एखाद्यासमोर व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी हमखास ‘व्हॅलेंटाईन डे’ची निवड करत असतात. मात्र, अमरावतीमधील एका महाविद्यालयाने या ‘व्हॅलेंटाईन डे’ची चांगलीच धास्ती घेल्याचं दिसत आहे. कारण प्रेम विवाह करणार नाही अशी शपथ विद्यार्थिंनीला देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना एक वेगळीच शपथ घेण्यास भाग पाडले आहे. प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही अशी शपथ विद्यार्थिंनी घेतली आहे.
मी अशी शपथ घेते की, माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी प्रेम, प्रेम विवाह करणार नाही. तसेच माझं लग्न हुंडा घेणार्या मुलाशी करणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेत आहे, अशी शपथ विद्यार्थिंनींना देण्यात आली आहे. दरम्यान, प्रेम दोन जिवांना जोडणारा दुवा म्हणून काम करत असतं. मात्र, जागतिक प्रेम दिनी प्रेमच करणार नाही, अशी शपथ देऊन शाळेने नवीन पायंडा पाडला आहे.
मुलांनी शपथ घ्यायला हवी – पकंजा
व्हेलन्टाइन डेच्या निमित्ताने अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली त्यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना पंकजा मुंडेंनी ट्विट केलंय की, मुलींनाच शपथ का? त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही. जिवंत जळणार नाही. वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितले तर त्याला जबरदस्त जवाब देणार असं त्यांनी सांगितले.




