अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या गोण्यांमधून कांदे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या घटनेत एका शेतकर्याला दुचाकीच्या चैनने डोक्यात मारून जखमी करण्यात आले असून, नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
जखमी देविदास नागरे (वय 35, रा. महींदा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी सोमवारी (8 जून) सायंकाळी फिर्याद दिली आहे. गंगाधर नागरे (रा. बारदरी, ता. अहिल्यानगर) व तीन अनोळखीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादी सकाळी साडेदहाच्या सुमारास नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या गोण्यांजवळ बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी नागरे हा तेथे पडलेल्या कांद्याच्या गोणीतून कांदे काढत होता. यावेळी फिर्यादीने त्याला कांद्याचा लिलाव होऊ दे, त्यानंतर कांदे काढ असे सांगितल्याने आरोपी संतापला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून तेथून निघून गेला. काही वेळानंतर नागरे हा आणखी तीन अनोळखी व्यक्तींना सोबत घेऊन घटनास्थळी परत आला. यातील तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीला पकडून ठेवले, तर नागरे याने दुचाकीची चैन काढून नागरे यांना मारहाण करून जखमी केले. दरम्यान, जखमी नागरे यांच्यावर उपचार सुरू असतानाच फिर्यादीला त्यांचे चुलत भाऊ म्हातारदेव नागरे यांचा फोन आला. त्यात त्यांनाही संबंधित संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे सांगितले.




