बीड | Beed
गेल्या ११ वर्षांपासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. शिवसेनेचा दसरा मेळावा जसा राज्यात लक्षवेधी ठरतो, तसेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंचा ह्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असते. सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशात पूरजन्य परिस्थिती आणि बीडमधील मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून भाषण करत मुंडे साहेबांच्या आठवणी जागवल्या. वडिलांसमवेत मी दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर येत होते, अशी आठवण सांगितली. तसेच, जातीपातीचे राक्षस संपवण्याची गरज, जातींना एकत्र बांधण्याचे काम माझ्याकडून झाले पाहिजे, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
राज्यात जातीयवादी रक्तबिजासारख्या राक्षसांचं मोठं आव्हान
राज्यात जातीयवादी रक्तबिजासारख्या राक्षसांचे मोठे आव्हान असल्याचे मोठे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी आमदार धनंजय मुंडे, प्रतिम मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.
भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला
“तुम्ही वाटोळे केले पोरांनो, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात, माहीत नाही. तुम्हाला शरम नाहीये. जर कुणाचं वाईट झालं तर, जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती. जी शरम माझ्या नजरेत होती. ती शरम तुमच्या नजरेत दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात, हे मला कळलं आहे. जो दसरा मेळावा माझ्या भगवानगडावर व्हायचा, तो माझ्याकडून हिरावून घेतला. आता हा मेळावाही तुम्ही माझ्याकडून हिरावून घ्यायला आला आहात, असं वाटायला लागलं आहे. मी इतकी वर्षे इथं भाषण केलं, पण कुणी इतकं बेशिस्त वागलं नाही, तुम्ही शुद्धीवर नाहीत. अशी माणसं मी सांभाळतच नाही.”
मी कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा रुपया घेतला नाही
एखादा रेकॉर्ड मी मोडला, तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करते. भगवान बाबांसाठी जे करायचं ते मी केलं, जे सावरगाव ओळखीतच नव्हतं, लोकांना माहितही नव्हतं. ते सावरगाव म्हणजे भगवान बाबांचं जन्मगाव, इथं भगवान बाबांची भव्य मूर्ती मी उभारली. मी एकटीने हे केलेलं नाही, तर माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलंय. कुणाचा रुपया घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही, कुणाच्या चहात मिंधी नाही, पण भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभा केलंय, असे पंकजा यांनी म्हटलं. सरकारी कामातून हे उभं राहिलं नाही, तर ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून हे मंदिर उभा केलंय, असेही पंकजा यांनी म्हटलं. पंकजा मुंडेंनी पूरग्रस्त भागातील पीडित शेतकऱ्यांना उद्देशूनही भाषण केलं.
संघर्ष वारशातूनच मिळालेला आहे
संघर्ष हा आपल्या वारशातूनच मिळालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सारखाच माझाही संघर्ष सुरू आहे. मी कधीच जात पाहिलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे, मराठवाड्यातील लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांचे दु:ख पाहून मी हेलावून गेले. मी माझ्या वेदना शब्दांत मांडू शकत नाही.नैसर्गिक आपत्तीत जाती-पातीचे बंध गळून पडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका, असे म्हणत पंकजा मुंडेंनी भावनिक शायरी म्हटलं.
जब देखती हूँ भुके बच्चे,
फटे हुए कपडों मे माँ,
गरिबी मे तडपता परिवार
मै खून के आँसू रोती हूँ,
मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ… अशी शायरी पंकजा यांनी यावेळी म्हटली.
रक्तबिजासारखा राक्षस जन्माला आलाय
मी आपल्या सर्वांना सांगते, आपण नवरात्रात 9 दिवस देवीची पूजा केली. त्या देवीने काय केलंय, महिषासुरासारखा राक्षस, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला. आजच्या कलयुगात रक्तबिजासारखा राक्षस जन्माला आलाय. हा राक्षस तुमच्या सर्वांच्या बुद्धीत जन्माला आलाय. आता, तुमच्या बुद्धीतून, तोंडातून, विचारातून अनेक जातीवादाचे राक्षस उभे राहत आहेत, धर्मावादाचे राक्षस. त्यामुळे, दुर्गेची पूजा करताना, रक्तबिजासारखे राक्षस संपविण्याची शक्ती आम्हाला दे हीच मागण मी करते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी जातीय राजकारणावर प्रहार केलाय. भविष्यात जातींना एकत्र गुंपण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे, ही माझी इच्छा आहे, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





