दिल्ली । Delhi
निसर्गाचा प्रकोप किती भयानक असू शकतो, याचा अंगावर काटा आणणारा प्रत्यय सोमवारी सकाळी संपूर्ण जगाने घेतला. आशियाई महाद्विपातील फिलीपिन्सच्या मिंडानाओ (Mindanao) बेटाजवळ झालेल्या एका अत्यंत विनाशकारी आणि शक्तिशाली महाभूकंपामुळे संपूर्ण आशिया खंड हादरला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने या भूकंपाची तीव्रता तब्बल ८.२ रिश्टर स्केल इतकी प्रलयंकारी नोंदवली आहे, तर USGS ने प्राथमिक तीव्रता ७.८ जाहीर केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर असल्याने याचे हादरे अतिशय तीव्र आणि विनाशकारी होते. भूकंप होताच मिंडानाओ आणि आसपासच्या शहरांमध्ये बहुमजली इमारती पत्त्यासारख्या डोलू लागल्या. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून लोकांनी जीवाच्या आकांताने रस्त्याकडे धाव घेतली.
हा भूकंप समुद्राच्या अंतर्गत भागात झाल्यामुळे पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने (PTWC) आंतरराष्ट्रीय स्तरावर त्सुनामीचा (Tsunami Warning) गंभीर इशारा जारी केला आहे. फिलीपिन्सच्या किनारपट्ट्यांवर तब्बल १ ते ३ मीटर (१० फुटांपर्यंत) उंचीच्या विनाशकारी लाटा धडकण्याची दाट शक्यता आहे. फिलीपिन्सच्या ‘फिवोल्क्स’ (PHIVOLCS) संस्थेने नागरिकांना सखल भागातून तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे कडक आदेश दिले आहेत. या महाभूकंपाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारील देश इंडोनेशियानेही (BMKG) आपल्या ईशान्य किनारपट्टीवर, विशेषतः सुलावेसी आणि मालुकु बेटांवर ‘हाय-अलर्ट’ घोषित केला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
भूकंपाचा सर्वाधिक फटका मिंडानाओमधील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या ‘जनरल सँटोस’ (General Santos City) शहराला बसला आहे. येथे अनेक व्यावसायिक इमारती, मॉल आणि घरांचे भाग कोसळले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, “हा आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक भूकंप होता, जमीन एखाद्या नौकेसारखी डोलत होती.” अनेक भागात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आपत्कालीन बचाव पथके (Emergency Rescue Teams) आणि रेड क्रॉसचे जवान युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.
चिंतेची बाब म्हणजे, या महाभूकंपाच्या अवघ्या काही तास आधी रविवारी रात्री उशिरा भारत आणि भूतानच्या सीमावर्ती भागातही तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. भूतानमधील पुनाखाजवळ ५.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. याचे हादरे भारतातील आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालसह नेपाळ, चीन आणि बांगलादेशातील काही भागांतही जाणवले. एकाच २४ तासांच्या आत आशियाच्या वेगवेगळ्या भागांत लागोपाठ झालेल्या या भूकंपांमुळे संपूर्ण आशियाई प्रदेशात भीतीचे वातावरण आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या कवचाखाली असलेल्या प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्समधील (Tectonic Plates) अंतर्गत घर्षणामुळे हे भूकंप होत आहेत. फिलीपिन्स आणि इंडोनेशिया हे देश जगातील सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ पट्ट्यात येतात. वैज्ञानिकांच्या मते, भारताचा अंदाजे ५९ टक्के भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली ही ‘झोन ४’ (Zone 4) मध्ये समाविष्ट आहे. याचा अर्थ भविष्यात उत्तर भारतातही मोठा भूकंप होण्याचा धोका नाकारता येत नाही. या लागोपाठच्या घटनांमुळे जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ आशियातील टेक्टॉनिक प्लेट्सच्या दबावाचा बारकाईने अभ्यास करत आहेत.




