नवी दिल्ली | New Delhi
दहा राज्यांमधील राज्यसभेच्या (Rajyasabha Election) ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी भाजपने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली असून, यात सहा राज्यांतील एकूण नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. त्यामुळे आज किंवा उद्या रात्रीपर्यंत राज्यातील भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपने पहिल्या यादीत बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यात बिहारमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नबीन हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ते राज्यसभेवर निवडून आल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बिहारमधील (Bihar) भाजपच्या संख्याबळाचा विचार केल्यास नितीन नबीन यांची निवड निश्चित मानली जात आहे.
महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?
महायुतीमध्ये राज्यसभेसाठी भाजपच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. त्यातील एक जागा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तर उर्वरित तीन जागांवर रस्सीखेच सुरु असून, त्यामध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, भारती पवार, माधव भंडारी, दिलीप कांबळे, अमर साबळे यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.
कोणत्या राज्यात राज्यसभेच्या किती जागांवर निवडणूक?
राज्यसभेच्या ३७ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. त्यानंतर तामिळनाडूमधून ६, बिहार, पश्चिम बंगालमधून ५,ओडिशातून ४, आसाम ३, तेलंगाणा २ तर छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक उमेदवार निवडून दिले जाणार आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत कुणाला संधी?
बिहार – नितीन नबीन, शिवेश कुमार, आसाम – तेराश गोवाला, जोगेन मोहन, छत्तीसगड – लक्ष्मी वर्मा, हरियाणा – संजय भाटिया, ओडिशा – मनमोहन सामल, सुजीत कुमार, पश्चिम बंगाल – राहुल सिन्हा





