नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) आज (रविवारी) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकीची (Election) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाची देखील पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू (Death) झाला होता. त्यामुळे राज्यावर शोककळा पसरली होती. यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोग बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरी या पाच राज्यांतील विधानसभेचा कार्यकाळ मे आणि जून २०२६ मध्ये संपणार आहे. या निवडणुकांत भाजपसह (BJP) इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची कसोटी लागणार आहे. त्याशिवाय विविध राज्यांमधील राज्यसभेच्या ७५ जागांवर एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणेच उदयाला येणार नाहीत तर राजकीय दशा आणि दिशाही बदलणार असल्याचा दावा केला जात आहे.
आचारसंहिता लागू होणार
निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच संबंधित राज्यांमध्ये ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ तात्काळ लागू होईल. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून २०२६ मध्ये संपत आहे, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.





