नाशिक | Nashik
सध्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Cooperative Bank) आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्याधर अनास्कर यांची प्रशासक (Administrator) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या परीने ते बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे बँकेच्या आर्थिक परिस्थितीवरून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे मंत्री आमनेसामने आले असून, दोघांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शनिवारी (दि.१२) रोजी माध्यमांशी संवाद साधताना ‘नाशिक जिल्हा बँक ही एकेकाळी महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. पण, सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली, असा आरोप केला होता. त्यावर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर देतांना ‘नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झाला आहे’, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
मंत्री कोकाटे म्हणाले की, “नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत छगन भुजबळांचा गैरसमज झाला आहे.बँकेच्या निवडणुका (Election) घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे. निवडणुका बँकेला परवडणाऱ्या नाहीत. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवली, असा आरोप चुकीचा आहे. कुठल्याही राजकीय पुढार्याकडे बँकेचे कर्ज येणे नाही. त्यामुळे बँक त्यांनी बुडवली, असे म्हणता येणार नाही”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “काही गोष्टीत चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक कर्ज वाटप झालेले आहे. हे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा राजकीय आरोप करणे चुकीचा आहे. कोणताही वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी, यासाठी प्रशासक राहावा, ही माझी पण इच्छा आहे. त्यामुळे फार गैरसमज करण्याचे कारण नाही,” असेही मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी म्हटले.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
नाशिक जिल्हा बँकेची कृपा करून निवडणूक घेऊ नका. ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांचे पोरं पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहायला तयार आहेत. ती बँक कधीच वरती येऊ शकणार नाही. बँकेत आता आलेले प्रशासक अत्यंत हुशार असून, त्यांच्या कामात कुठेही हस्तक्षेप करू नका. बँक बुडवायचे काम सर्व नेत्यांनी मिळून केलेले आहे. मात्र, यात सगळ्यात जास्त नुकसान जिल्ह्यातील शेतकर्यांचे (Farmer) झालेले आहे. त्यामुळे आता प्रशासकाला काम करू द्यावे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.





