नाशिक | Nashik
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा (Munde) देऊन चार महिने उलटले आहे. मात्र, मुंडे यांनी अद्यापही त्यांचा मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंडे यांना तब्बल ४२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दुसरीकडे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ हे बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. या संपूर्ण प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून, याबाबत भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थान कुठे असावीत या संदर्भातील व्यवस्था बघत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिलं की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावं” असे भुजबळ यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “कुठे राहायला जायचं म्हटल्यावर एखादे घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे.मी अजून त्यांना एका शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील”, असे भुजबळ म्हटले.
तसेच माध्यम प्रतिनिधींनी भुजबळ यांना आपण याबाबत अजित पवार अथवा इतर कोणत्या नेत्यांशी चर्चा केली का? असे विचारले ते म्हणाले की, “अजितदादांनी विचारलं पण मी म्हटलं की, घर खाली झालं की जाईन. आमचे ते पक्षातील सहकारी आहेत. मी काय तक्रार करणार नाही. मी फार-फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरे एखादे छोटे-मोठे घर असेल तर ते द्या. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही”, असेही भुजबळ यांनी सांगितले.





