Monday, July 27, 2026
Homeराजकीयअंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला...; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला…; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मुंबई । Mumbai

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर मुंबईत ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा मोर्चाचे रूपांतर विजयी सभेत झाले. या सभेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

- Advertisement -

विजयी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचे कौतुक करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. “अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. हा केवळ एका राजीनाम्याचा मुद्दा नसून संघर्षाची सुरुवात आहे. भाजपविरुद्ध भारत असा संघर्ष सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आंदोलनाच्या परिणामाचा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करत, “मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांनी देशाच्या प्रशासनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असे म्हटले. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही टीका करत, “घसरता रुपया आणि वाढती महागाई यावर भाष्य करण्याऐवजी त्या पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत,” असा आरोप केला. याचबरोबर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी संबंधित प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या वेदनांवरही भाष्य केले. “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेताना मोदीजींना जितक्या यातना झाल्या असतील, त्यापेक्षा अधिक वेदना विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सहन केल्या आहेत. त्या वेदना आम्ही विसरणार नाही,” असे ते म्हणाले. विद्यार्थी आंदोलनाचे कौतुक करताना त्यांनी तरुणांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित केले. “कधी कधी शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरते. तुम्ही सर्वांनी देशाच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले आहे. या जागृतीची नोंद इतिहासात होणारच. आता निर्माण झालेली ही जाग कायम ठेवा आणि समाजहिताच्या प्रश्नांवर सजग राहा,” असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : कारवाईचा संताप, मर्सडीजचा भुगा! बडतर्फ केल्याच्या रागातून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik होमिओपॅथी मेडिसिनच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास (Student) शिस्तभंगाच्या कारवाईतून वैद्यकीय महाविद्यालयाने बडतर्फ केले असतानाच, हा राग मनात धरून त्याने...