नवी दिल्ली | New Delhi
महाराष्ट्रात (Maharashtra) निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीकडे केंद्र सरकारचे (Central Government) लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार सोमवारी (१० मे) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सकाळी ११ वाजता संसदेतील पंतप्रधान कार्यालयात (PMO Office) ही भेट होणार आहे.
पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात पक्षाचे इतर सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, यासाठी हे शिष्टमंडळ थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे मांडणार असल्याने या भेटीला राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील परिस्थितीवर चर्चा होणार
महाराष्ट्रातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाऱ्याचा प्रश्न आणि पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला केंद्र सरकारकडून तातडीने आर्थिक मदत, दुष्काळग्रस्तांना दिलासा आणि विशेष पॅकेज मिळावे, अशी आग्रही मागणी या भेटीदरम्यान खासदारांकडून (MP) केली जाणार आहे.




