मुंबई | Mumbai
बेस्ट पतपेढी निवडणुकीत (Best Pathpedhi Election) ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची आज (गुरुवारी) सकाळी ९ वाजता’वर्षा’ या शासकीय निवासस्थान जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यासोबत वाहतूक कोंडी या विषयावर चर्चा केल्याचे सांगितले. यावेळी त्यांना पत्रकारांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीवर प्रश्न विचारला असता त्याला बगल दिली.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी २१ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांचे सर्व उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले. यात शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार ही निवडणूक जिंकले. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून या निवडणुकीत प्रचंड गाजावाजा देखील झाला. त्यानंतर याच निवडणुकीवरून राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी भाष्य केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मला बेस्ट पतपेढी निवडणुक हा विषयच माहिती नाही. या छोट्या निवडणुका असून, लहान गोष्टी आहेत. त्या स्थानिक निवडणुका आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवं, याची आग लावा, त्याची आग लावा”, असे म्हणत त्यांनी पतपेढी निवडणुकीच्या (Election) विषयावर बोलणे टाळले.
राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
गेल्या अनेक दिवसांपासून आपण फक्त कबुतरं आणि हत्तांमध्ये अडकलो आहे. यामुळे आपल्या मूलभूत समस्यांकडे आपलं लक्ष नाही. गेले काही महिन्यांत मी मुख्यमंत्र्यांशी (CM) एक दोन वेळा भेटलो. महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो. साधारणपणे त्याचा आराखडा कसा करता येईल यावर चर्चा होती. २०१४ मध्ये अस्थेटिक या विषयावर मी १६ मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. ती इतर भाषेतही करत आहे. टाऊन प्लानिंग आणि इतर गोष्टी आवडीचे विषय आहेत. मी जे सांगतो त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही. त्यामुळे सांगणं गरजेचे आहे. नाही तर लोकांची मते घेत बसाल. एका स्कॉटिश साहित्यिकाचे चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मी ते वाक्य बदलू इच्छितो. तुमच्याकडच्या ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा. मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरात मोठ्या प्रमाणावर रिडेव्हल्पेंटची कामे सुरू आहेत. अनधिकृत गोष्टीही सुरू आहेत” असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
तसेच “आज जिथे ५० लोक राहत होती. त्याठिकाणी ५०० लोक राहत आहेत. माणसे वाढली, गाड्या वाढल्या ट्रॅफिक वाढले. सर्व गोष्टी रस्त्यावर आल्या. पार्किंग लॉट उभे करायला हवेत, या समस्यांवर तोडगा काढला नाही, तर कठीण आहे. याचा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला. रोज या शहरावर माणसं येऊन आदळत आहेत, रस्ते नाहीत, नुसत्या उंचच उंच इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते बांधणं हा धंदा झाला असून, वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणावी, नको तिथे भीती घालतात, अर्बन नक्षलवादापेक्षा याकडे लक्ष द्या”, असेही राज ठाकरे यांनी सुनावले.





