मुंबई | Mumbai
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला (Walmik Karad) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. तसेच वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या असून,त्याचे पाय आणखी खोलात गेला आहे.
न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्यासमोर आज (गुरुवारी) वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण जर ट्रायल पुढे जात नसेल तर वर्षभरात पुन्हा वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो.
दरम्यान, या प्रकरणाची (Case) पहिली सुनावणी १९ फेब्रुवारीला करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली असता सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि बीड जिल्हा न्यायालयात (Beed District Court) वाल्मीक कराडचा जामीन अर्ज आणि दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh Murder Case) यांची ०९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. यात त्यांचे ०९ डिसेंबरला अपहरण झालं आणि त्यानंतर हत्या झाल्याचे समोर आले होते. यानंतर १० डिसेंबरला हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक करण्यात आली. तर १२ डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली. त्यानंतर १८ डिसेंबरला विष्णू चाटेला बीडमधून आणि ०४ जानेवारीला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाली. तसेच सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक झाली. तर याप्रकरणातील कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
कृष्णा आंधळे तीन वेळा गावी आल्याचा दावा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केला आहे. आंधळे गावी आल्याची माहिती सीआयडीला देखील दिली होती, असे त्यांनी सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला अटक कशी करायची याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका असून, कृष्णा आंधळेला अटक करून त्याची जिल्हाभरात धिंड काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
देशमुख कुटुंबियांचा सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा
वाल्मिक कराडने यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता त्याचे अर्ज फेटाळण्यात आले होते. अखेर कराडने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. पंरतु, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.





