अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणात चांगलाच बदल दिसत आहे. दिवसभराच्या उन्हाच्या कडाक्यानंतर दुपारी चारनंतर आकाशात ढग दाटून येत मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसतांना दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. यात सहा तालुक्यांत 46 घरांची पडझड झाली आहे. तर दोन तालुक्यांत 9 शेळ्या आणि मेंढ्या मरण पावल्या आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी चारनंतर अनेक ठिकाणी वादळी वार्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. राहुरी, राहाता, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील विविध भागात या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात राहाता 15, कर्जत 5, राहुरी 2, श्रीगोंदा 10, पारनेर 2 आणि नेवासा 12 अशा एकूण 46 घरांची वादळी पावसात पडझड झालेली आहे. यासह पारनेर तालुक्यात झाड पकडून पाच मेंढ्या तर श्रीगोंदा तालुक्यात वीज पडून 4 शेळ्या मयत झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
एमआयडीसीत पाऊण तास वादळी पाऊस
नगर एमआयडीसीत शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला शांतेत पडणार्या पावसाने अचानक रौद्र रुप धारण केले. यावेळी सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस सुरू होता. साधारण सव्वा सहानंतर हा पाऊस थांबला. दरम्यान, एमआयडीसी भागातील रस्ते आणि परिसर पहिल्याच पावसात चांगलाच धूवून निघाल्याचा भास होत होता. पावसानंतर एमआयडीसी भागात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. या वादळाचा फटका सर्वांना बसल्याचे दिसत होते.




