मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात वन्याप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. शिवाय वन्य प्राण्यांना खाद्य मिळावे यासाठी पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म तयार करण्यात येतील, असेही नाईक यांनी जाहीर केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात सात महिलांवर वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल भाजपच्या अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना नाईक यांनी विविध घोषणा केल्या. राज्यात २०२३ मध्ये ५५ लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. हे हल्ले कमी करण्यासाठी वन विभागाने २६० कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरीही दिली आहे. यातील किती कोटी रुपये आपल्या खात्याकडे वर्ग झाले आहेत, असा प्रश्न भातखळकर उपस्थित केला.
४५० वाघांचे स्थलांतर होणार
जंगलाच्या क्षमतेत वाघ ठेवणे गरजेचे आहे. जंगलापेक्षा तिथे चारपट वाघ असलील तर ते बाहेर येऊन लोकांवर हल्ले करतात. त्यामुळे विदर्भाच्या जंगलातील अतिरिक्त वाघ दुसरीकडे हलवा. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या, अशी मागणी काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांनी केली. यावर बोलताना नाईक यांनी पुढील ४२ महिन्यात ताडोबाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात अभयारण्य केली जातील. त्यात ४५० वाघ स्थलांतरीत केले जातील, असे नाईक यांनी जाहीर केले.
पोल्ट्रीच्या धर्तीवर रॅबिट फार्म
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी जंगलात खाद्य कमी व्हायला लागल्याने खाद्य निर्माण करण्यासाठी इतर प्राणी संख्या वाढवण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे, असा मुद्दा मांडला. यावर गणेश नाईक यांनी पोल्ट्री फॉर्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म तयार करू तसेच हरणांची प्रजाती वेगाने वाढवण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.




