नाशिक । प्रतिनिधी
गाव ते जिल्हा अशा 60 कि. मी. च्या अंतरात एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने दोन हजार साध्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे. येत्या वर्षभरात एसटीच्या या लालपर्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी 90 टक्के प्रवासी हे गाव ते जिल्हा अशा जवळपास 60 किमीच्या अंतरात प्रवास करतात. ही सेवा वाढविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाने दोन हजार साध्या परिवर्तन (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी 600 कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून वित्त विभागाला पाठविण्यात आला आहे. मागील वर्षी सरकारने 700 साध्या बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने 186 कोटींची मागणी सरकारकडे केली होती. त्यापैकी सरकारने 110 कोटी एसटी महामंडळास दिले आहेत. या 700 बसेस नुकत्याच दाखल झाल्या आहेत.




