अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया जोमात सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी अध्यक्ष पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी चार असे एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. राहाता नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी दोन, तर जामखेड नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी एक उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.
पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (10 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्ष गटांमध्ये उमेदवारांबाबत अंतिम निर्णय न झाल्याने पहिल्या दोन दिवसांत (10 व 11 नोव्हेंबर) अर्ज दाखल प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. तिसर्या दिवशी मात्र वातावरणात चैतन्य येत काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज सादर केले. राहाता शहरातील तुषार गणेश सदाफळ आणि भानुदास बकाजी गाडेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर जामखेड नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नसीम सलीम बागवान यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय सदस्यपदासाठी श्रीरामपूर येथे सीमा नितीन हारदे (अपक्ष) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व कोपरगाव नगरपरिषदेमध्ये प्रत्येकी एक बिना विजय भगत यांनी अर्ज दाखल केला, तसेच शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रताप फडके यांनी प्रभाग तीन मध्ये शिवसेनेकडून (शिंदे गट) व नीलेश रोकडे यांनी प्रभाग आठमध्ये अपक्ष असे दोन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र शनिवार व रविवार सुट्टी असल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार (13 नोव्हेंबर), शुक्रवार (14 नोव्हेंबर) आणि सोमवार (17 नोव्हेंबर) असे तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचे की स्वतंत्र उमेदवार उभे करायचे, याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षीय आघाड्यांपेक्षा स्थानिक नेत्यांचे वैयक्तिक वर्चस्व आणि समीकरणे निर्णायक ठरण्याची शक्यता दिसत आहे.




