मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जात आहे. परंतु, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार बी फॉर्म चोरून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व अधिकार्यांना लेखी कळवूनही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी येथे केला.
राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. निवडणूक प्रक्रियेमधील विसंगती, परिपत्रकातील अचानक बदल आणि फसवणुकीच्या चार उमेदवारी अर्जाबाबत अनिल देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राहता नगरपरिषदेमध्ये आम्ही आघाडी म्हणून लढत असताना शेवटच्या दिवशी आमच्या पक्षाच्यावतीने चार अर्ज दाखल केले गेले. याची माहिती मिळताच पिठासीन अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकार्यांना लेखी स्वरूपात कळवून हे अर्ज बाद करण्याची मागणी केली. हे अर्ज छाननीमध्ये बाद करणे अपेक्षित होते, असे देसाई म्हणाले.
पक्षाचे बी फॉर्म चोरणे हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. एवढे करूनही निवडणूक अधिकार्यांनी कोणतीही दखल न घेता ज्यांनी शिवसेनेच्यावतीने अर्ज दाखल केले ते वैध ठरवले गेले. आता मतचोरीबरोबरच आमच्या पक्षासोबत बी फॉर्म चोरीचा खेळ खेळला जात आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासणारा प्रकार आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.




