नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलन सुरु असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची घोषणा केली आहे. मात्र, मोदींच्या या घोषणेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पेपरफुटीप्रकरणाला त्यांनी थेट मोदींना जबाबदार धरले आहे. “तुम्हीच आमच्या तरुणांच्या भविष्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवण्यास आणि तिचा विध्वंस करण्यास केवळ परवानगीच दिली नाही तर प्रोत्साहनही दिले. त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले.”राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. “१. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. २. विद्यार्थ्यांची माफी मागा. ३. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा.”
तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. “देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. तसेच, “सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.” असे आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले आहे. तसेच, “विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असेही ते पुढे म्हणाले.




