सोनई |वार्ताहर| Sonai
राहुरी-शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकार्यांना बेल्हेकरवाडी येथील शेतकर्यांनी एकत्र येत विरोध दर्शविला व मोजणी प्रक्रिया थांबवली. वाढत्या तणावामुळे यंत्रणेने जमिनीची कोणतीच मोजणी न करता माघारी परतावे लागले असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे व भूमीअभिलेख नेवासा येथील अधिकारी सोमवार दि. 8 रोजी सकाळी या रेल्वे मार्गाची जमीन मोजणीसाठी आले असता उपस्थित शेतकर्यांनी पंचनामा लिहून दिला की, बेल्हेकरवाडी ता. नेवासा येथून राहुरी-शिंगणापूर रेल्वेसाठी भूसंपादन मोजणी कामी आपण समक्ष गावी जागेवर गट नंबर मध्ये आलात परंतु आमची भूसंपादन मोजणीसाठी सर्व गावकरी व शेतकरी यांचा विरोध आहे व तसेच आम्हाला रेल्वे मार्गाची आवश्यकता नाही व आम्ही सर्व अल्पभूधारक असून या रेल्वे मार्गामुळे आमचे खूप मोठे नुकसान होईल.
आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे हरकत अर्ज दिलेला आहे. आपण जर मोजणी काम केले तर आम्ही सर्व धारक आत्महत्या करू. तरी आपण भूसंपादन मोजणी करू नये, अशी आमची आपणास विनंती आहे. याप्रमाणे उपस्थित शेतकर्यांनी पंचनामा लिहून पंचांसमक्ष स्वाक्षर्या केल्या आहेत.




