मुंबई |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ‘जेन-झी’ (Gen Z) आणि ‘जेन-अल्फा’ पिढीतील युवकांशी संवाद साधत शिक्षण, लोकशाही आणि युवकांच्या भूमिकेबाबत आपले विचार मांडले. युवकांच्या समस्या आणि आंदोलनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भागवत म्हणाले, “जेनजीने आंदोलन करू नये असे मी बोलणार नाही. पण ते कसे करायला हवे याबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे, त्यात माहिती आहे. आंदोलन यंत्रणा सुधारण्यासाठी हवी. आपल्या किंवा तुमच्या विरोधात नसावे. जे नको व्हायला ते झाले तर चूक होते. तेव्हा हे होते. चुकीची कुणाची आहे हे नंतर येते. पण संवाद तर हवाच, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.
शिक्षण व्यवस्था ही केवळ व्यवसाय बनू नये, तर प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सुलभ शिक्षण मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणांची आवश्यकता अधोरेखित केली. युवकांच्या प्रश्नांवर संघर्षाऐवजी संवादातून मार्ग काढण्यावर त्यांनी भर दिला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जाबाबत विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी, “माझ्याकडे संपूर्ण माहिती नाही. केवळ बातम्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नेमके काय घडले, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे,” असे सांगितले.
युवा पिढीला देशाच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करत त्यांनी संवाद, विश्वास आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातूनच सक्षम राष्ट्रनिर्मिती शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.




