Tuesday, June 16, 2026
Homeक्राईम20 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 94 लाखांची फसवणूक

20 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 94 लाखांची फसवणूक

कांद्यासह गुटख्याच्या व्यापारात अनेकांनी गुंतवले पैसे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कांद्यासह गुटख्याच्या व्यापारात गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर मधील काही व्यक्तींची तब्बल 94 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा येथील दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात काल, सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. साबीर शौकत शेख (वय 33 रा. खानका शरीफ दर्गा, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. समीर शब्बीर सय्यद (रा. गांजुरे मळा, कॅनरा बँक, श्रीगोंदा), लतीफ मौला तांबोळी (रा. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मार्च 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान ही घटना घडली आहे. सुरूवातीला साबीर शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे फसवणूक झाल्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज तपासकामी कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

- Advertisement -

समीर सय्यद व लतीफ तांबोळी यांनी साबीर शेख व इतरांना कांदा व गुटख्याच्या व्यापारात गुंतवणूक करून 20 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले व त्यांचा विश्वास संपादन केला. समीर व लतीफवर साबीर व इतरांनी विश्वास ठेवला व त्यांना ऑनलाईन व रोख स्वरूपात 94 लाख रुपये दिले. दरम्यान, दिलेल्या रक्कमेवर 20 टक्के परतावा देण्याची मागणी साबीर शेख व इतरांनी समीर व लतीफ यांच्याकडे केली असता त्यांनी गुंतवणुकीवर परतावा न देता सदरची रक्कम स्वत:चे फायद्याकरिता वापरून साबीर शेख व इतरांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे साबीर व इतरांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांच्या चौकशीतून सदरचा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहेत.

मित्र, नातेवाईकांनाच घातला गंडा
समीर व लतीफ यांनी आपल्या मित्र, नातेवाईक यांनाच कांदा व गुटख्यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परतावा जास्त देण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केली. मात्र परतावा तर नाहीच दिला परंतु गुंतवणूक केलेली रक्कम देखील दिली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आणखी काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले असल्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...