मुंबई । Mumbai
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काही ठिकाणी बिनविरोध (Unopposed) निवडणूका पार पडल्या आहेत, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती (Contests) होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीतील या ‘बिनविरोध’ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप केला आहे. बिनविरोध निवडणुका होणे ही चांगली बाब आहे, यात शंका नाही, पण केवळ भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होतात, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या बिनविरोध झालेल्या निवडींमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यावरूनही रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री. प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ. नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा!
घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा #PARTY_WITH_DIFFERANCE आहे हे दाखवून दिलं.
असो…! वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत…!




