Sunday, June 14, 2026
Homeनगरभरदिवसा भरवस्तीत चोरट्यांनी 'धूमस्टाईल'ने साडेपाच तोळ्यांचे गंठण लांबवले

भरदिवसा भरवस्तीत चोरट्यांनी ‘धूमस्टाईल’ने साडेपाच तोळ्यांचे गंठण लांबवले

संगमनेर । प्रतिनिधी

संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेशनगर परिसरात भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या ‘धूमस्टाईल’ चोरीमुळे शहरात, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा आनंद हासे (वय ५६, रा. राजापूर) या सोमवारी दुपारी गणेशनगरमधील गल्ली क्रमांक १३ येथून आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. त्या गल्लीतून जात असतानाच, एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण तिथे आले. दोन्ही चोरट्यांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले होते, जेणेकरून त्यांची ओळख पटणार नाही.

चोरट्यांनी नंदा हासे यांच्या जवळ येऊन अचानक त्यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जोराने ओरबाडले. काही क्षणातच हे चोरटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हासे यांना मोठा धक्का बसला. भरवस्तीत ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकही अवाक झाले आहेत.

याप्रकरणी नंदा हासे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या साडेपाच तोळ्यांच्या दागिन्यांची किंमत मोठी असून, पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा माग काढत आहेत. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संगमनेर शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, पोलीस प्रशासन गस्त वाढवणार का? आणि महिलांमधील भीती कमी करण्यासाठी काय ठोस उपाययोजना करणार? असा प्रश्न आता संगमनेरकर विचारत आहेत. या गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन...

0
पंढरपूर । Pandharpur शेतकरी कर्जमाफीच्या अटींवरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळींमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली, तरी...