संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
अवैधरित्या होणार्या वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर अंभोरे शिवारात जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रकार घडला होता. यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली असून, दंडात्मक कारवाईच्या नोटिसा, सातबार्यावर बोजा चढवून शासनाचे नाव लावणे, बँक खाते सील करणे, जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव आदी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
अनेक दिवसांपासून वाळूतस्करांनी प्रवरा, मुळा, म्हाळुंगी, आढळा आदी नदीपात्रांतून शासनाचा महसूल बुडवून खुलेआम उपसा करुन वाहूतक केली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने त्यांची मुजोरी देखील वाढली होती. याला पायबंद घालण्यासाठी महसूल विभाग चांगलाच ‘अॅक्शन’ मोडवर आला असून, वाळूतस्करांवर कारवाईचा फार्स उगारला आहे. कोकणेवाडी ते दाढ खुर्दपर्यंत झालेल्या उपशाचे पंचनामे करुन संबंधित वाळूतस्करांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याचबरोबर जे वाळूतस्कर मागील दंड भरण्याचे बाकी आहे अशा सुनील बाळासाहेब पवार (ढोलेवाडी), अमोल संजय जोंधळे (गुंजाळवाडी), संजय तुकाराम कोकणे (धांदरफळ खुर्द), चेतन सूर्यभान साकुरे (निमज), मोहन बारकू भोकनळ (मंगळापूर), सुरज भाऊसाहेब रोडे (खंदरमाळवाडी), संदीप महादू नंदकर (शेळकेवाडी), स्वप्नील दत्तू गोफणे (धांदरफळ बु.), गणेश देवराम हासे (राजापूर) व दिगंबर माधव वाळे (मंगळापूर) अशा तस्करांच्या मालमत्तेवर अथवा सातबार्यावर बोजा चढवून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्यासही सुरूवात केली आहे.
यामुळे चांगलीच खळबळ उडाली असताना नऊ वाळूतस्करांचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या महसूल पथकावर वॉच ठेवला जातो. त्यामुळे तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना रात्रीच्या वेळी नदीलगत वाळूतस्करांवर कडक वॉच ठेवण्याच्या सूचना देऊन नवीन कलम 126 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकार्यांना पत्र देऊन महसूल पथकाला दोन शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी केली आहे. यात अधिक भर पडली असून, कारवाईत जप्त केलेल्या 28 वाळूच्या वाहनांचा लिलाव करुन दंड वसूल करणार आहे. दरम्यान, कोकणेवाडी ते दाढ खुर्दपर्यंत झालेल्या वाळू उपशाशी संबंधित पन्नास ते साठ वाळूतस्करांना नोटिसा देण्याचे काम सुरू झाले आहे. यांनीही दंड भरला नाही तर त्यांच्या मालमत्तेवरही बोजा चढविण्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले असून, गावोगावचे कामगार तलाठी, कोतवाल, मंडल अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे.
पंचनामे करुन कारवाई करणार…
ज्याठिकाणी अवैध वाळूउपसा अथवा वाहतूक होत असेल त्याठिकाणी पंचनामे करुन दंड वसुलीची कारवाई करणार आहे. दंड न भरल्यास मालमत्ता सरकार जमा करण्यात येणार आहे.
– धीरज मांजरे (तहसीलदार-संगमनेर)