मुंबई | Mumbai
आज कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. सध्या काँग्रेस ११६, भाजप ७५, जेडीएस २७ तर इतर उमेदवार ०५ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल दिसत आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) निशाणा साधला आहे…
राऊत म्हणाले की, “कर्नाटकात काँग्रेस (Congress) केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. कारण, या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता”, असे राऊतांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “कर्नाटकच्या (Karnataka) जनतेने मोदी-शाहांना झिडकारले आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली”, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द केरळ स्टोरी या चित्रपटावरूनही प्रचंड राजकारण झाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकमध्ये कोणतीही स्टोरी चालली नाही, फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा ही भाजपच्या डोक्यावर पडली. बजरंग बली हा श्रीरामांचा भक्त होता, पण तो जनतेच्या आणि सत्याच्या बाजूने गेला आहे, असेही त्यांनी म्हटले.