मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील घडलेल्या राजकीय भूकंपानंतर काल अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते.
तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळण्याला संजय राऊत कारणीभूत असल्याची टीका केली गेली. यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार का? असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारात इथली स्वाभिमानाची मिठ भाकरी सोडून, तुम्हाला तिकडे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
तसेच मी ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका मांडेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी हे सगळे दबाव सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या याच दबावामुळे आमच्या पक्षातील काहीजण पळून गेले. पण मी उद्या दुपारपर्यंत ईडीसमोर चौकशीसाठी हजर होईन. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोर जाईन, असे संजय राऊत यांनी सांगितले.