बीड | Beed
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. याप्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. हा वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचे असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोपींनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याच संबंधित हा व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये पीएसआय राजेश पाटीलही दिसत आहेत.
त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी आणि एसआयटीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हा मोठा पुरावा मानला जातोय. यापूर्वी केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल मधले सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आले होते. ज्यात पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे.
या नव्या व्हिडीओमुळे जामीनाच्या प्रतिक्षेत असलेला वाल्मिक कराड यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. हा सुरक्षारक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता. त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.