मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर पोलिसांनी शनिवार (दि.११) रोजी मोक्का लावला आहे. मात्र,वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या गुन्ह्यात अटक असून पोलिस त्याचा तपास करत आहेत.
तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात पाच मोबाईल जप्त केले असून हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पंरतु, आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) याचा मोबाईल (Mobile) अद्याप सीआयडी’ला सापडलेला नाही. यावरून आता न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. विष्णू चाटे याने फरार असताना मोबाईल हा नाशिकमध्ये फेकून दिला असल्याची माहिती समोर आली असून तो मोबाईल कुठे फेकला हे आठवत नसल्याचे सीआयडीला सांगत असल्याचे बोलले जात आहे.
विष्णू चाटेने स्वत:च्या मोबाईलवरुनच वाल्मिक कराडला (Walmik Karad) फोन केल्याचा संशय असून त्याच मोबाईलवरुन खंडणीची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विष्णु चाटे याने फेकलेला मोबाईल या हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. विष्णु चाटे याच्या फोनवरुन वाल्मिक कराड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता. त्यावरुन त्याने दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हाच त्याने हातपाय तोडण्याची धमकी संतोष देशमुख यांना दिली होती, असा संशय सीआयडीला असून या प्रकारच्या ऑडीओ क्लिप पोलिसांना सापडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तपासाला वेग येण्यासाठी विष्णु चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे.
दरम्यान, विष्णु चाटे फरार असताना नाशिकमध्ये (Nashik) असल्याचे सांगितले जात असून तिथेच त्याने फोन कुठेतरी फेकल्याचे बोलले जात आहे. मात्र, फोन कुठे फेकला हे तो सांगत नाही, त्यामुळे मोबाईल शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर (Police) निर्माण झाले आहे. तसेच आरोपी विष्णू चाटेला उद्या पुन्हा न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी राज्याबाहेर सीआयडीचे पथक पाठविण्यात आले आहेत.